पुष्पाग्रज : अशोक नाईक तुयेकर : शिक्षण बीएससी(केमिस्ट्री) : शिक्षक: पत्रकार

पुष्पाग्रज : अशोक नाईक तुयेकर : शिक्षण बीएससी(केमिस्ट्री) : शिक्षक: पत्रकार

नरेंद्र बोडके यांची आणखी काही निरीक्षणे

... गोमंतकीय कवितेचे एक खणखणीत नाणे म्हणजे पुष्पाग्रज ! पुष्पाग्रज यांची कविता नकारभरल्या वास्तवाच्या संदर्भात प्रतिक्रिया म्हणून उद्भवताना दिसते. हे वास्तव फार भगभगीत झाले की तो आपले कॅलिडिस्कोपिक परिमाण जागे करतो आणि स्वप्न-वास्तवाच्या पातळीवरील एक स्वतंत्र जग त्याला त्यात दिसते. वास्तवाला भिडताना दु:खाच्या डोळेभेटीमुळे निर्माण होणारे आंतरिक ताण-तणाव त्याच्या कवितेतून प्रकट होत राहतात.
........
‘पुष्पाग्रज’(अशोक नाईक तुयेकर) यांच्या कवितेतही दु:खानुभव व्यक्त होतात. आयुष्यात येणार्‍या अनुभवांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न कवी करतो. आयुष्याबद्दल फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या नाहीत, तरी आकस्मिक अपेक्षाभंगाचे दु:ख येतेच ! हे लक्षात आल्यावर कवी म्हणतो, 

‘या अवेळीच्या पानगळीला,
मी शिशिर कसे म्हणू ?’

पुष्पाग्रज यांचे ‘कॅलिडोस्कोप’(1983) ‘नन्रूख’(1992) व ‘शांतिअवेदना’(2010) असे तीन संग्रह त्यांच्या नावावर आहेत. एकाकीपणा, उदासीनता, निराशा, भय, अशाश्‍वता या दु:खानुभवांचे गडद रंग त्यांच्या कवितांमधून उमटतात. त्यांच्या कवितेच्या पुढच्या टप्प्यात समाजवास्तवही प्रगटले. ‘शांतिअवेदना’ या नव्या संग्रहात अस्तित्व शोधाची अनेक रूपे प्रकट झाल्याचे दिसते.

‘शांतिअवेदना’ हा असा एक आश्रम असतो, जिथे मृत्यूचे अंतिम सत्य घेऊनच माणसे प्रवेश करीत असतात. कर्करोगाने ग्रासलेल्या या माणसांना घराने नाकारलेले असते. अखेरच्या दिवसात त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारी माणसेही याच जगातली असतात. ‘शांतीअवेदना’ हे सुसह्य मृत्यूचे आवतण देणारे एक अनोखे मंदिर असते. मृत्यूच्या वेढ्यात अडकलेली माणसे आणि त्यांचा झुंजार जिवटपणा या संग्रहात पुष्पाग्रजांनी शब्दात पकडला आहे. मानवी जीवन म्हणजे मृत्यूच्या प्रतीक्षेत शांतीअवेदना आश्रमात घालवलेला काळ आहे, अशा रूपकाच्या पातळीवर हा शब्द आपल्याला घेऊन जातो. शांतीअवेदनाच्या मलपृष्ठावर कवयित्री प्रज्ञा पवार यांनी नोंदविलेले निरीक्षण चिंतनशील आहे.

- नरेंद्र बोडके
(गोमंतकीय मराठी कवितेचे अर्धशतक, संपा. नरेंद्र बोडके, प्रका. नंदिनी तांबोळी, पुणे, 2010)

No comments:

Post a Comment