पुष्पाग्रज : अशोक नाईक तुयेकर : शिक्षण बीएससी(केमिस्ट्री) : शिक्षक: पत्रकार

पुष्पाग्रज : अशोक नाईक तुयेकर : शिक्षण बीएससी(केमिस्ट्री) : शिक्षक: पत्रकार

काही कविता


किती लक्ष वाटातुनी हिंडताना


किती लक्ष वाटातुनी हिंडताना
कसा गुंतलो ना वाटातुनी
कधी आडवाटातुनी पाय गेले
तरीही दिशा नादल्या पैंजणी
प्रवासात जेथे धुके भेटले ते
जरा वेचियेले शब्दातुनी
कधी शब्द गांधार होऊन आले
कधी दाटली अक्षरे डोळुलीं
उन्हाळाच आहे उभा रूक्ष दारी
चुकूनी कधी पावसाच्या सरी
अधाशीपणे चाखले थेंब पाणी
तयाची नशा व्यापली जीवनी
कवितेतूनी चित्र रेखियले ते
न आले कधी शब्द ओलांडुनी
जशा देव रंभा जळांतुनी येती
न्हाती परी कोरडी ही तळी
प्रवासास ऐसा निघालो जिथुनी
त्या वाटा पुन्हा आज खुणावती
मला माऊलीचे पडे स्वप्न देहीं
तिच्या गर्भगारात माझी मठी

गोकुळ

झुंजुमुंजू प्रहराकाठची ही
कृष्णसकाळ
धुक्यात लपेटलेले थर्थर गोकुळ
खूप काळचा आघात सावरीत, उभे स्थितप्रज्ञ...

यमुनेच्या जळात बुडणार्‍या
घड्यांचा आवाजही भयग्रस्त वाटतो अशावेळी
बावरलेली राधा...
असहाय्य पेंद्या...

अरे तुझी सोन्याची द्वारका
लुटली जात आहे रे कृष्णा...

प्रत्येकाच्या मनातून हरवत चालली आहे
बासरीची धून
बारमाही शिशिर ऋतूत सुलाखून
निघालेली वृक्षवल्ली
बेसहारा गुरांचे कळप हंबरणारे
वेळूच्या बनातून आता
नाहीच का ऐकू येणार हरीचा पावा ?

हे गोकुुळ
संजीवनीची वाट पहात...
आणि दूर दूर सरकणारे श्रावणघन

महाप्रलयाने दुथडी भरून वाहणारी यमुना
आणि पैलतीरावर तिष्ठत राहिलेला वसुदेव

देवकी, तुझ्या कुशी जन्माला येणारा
आठवा पुत्र
कृष्णच असेल यावर आता आमचा
विश्‍वास नाही
आता आमचा विश्‍वास नाही…



मित्रा

मित्रा-
तू लिहितोस ‘तू सुखी आहेस ना!’
कठीण आहे दोस्त सांगणे आणि आहे संशयही
तुझ्या सुखाच्या व्याख्येत मी बसतो की नाही याचा
मृत्यूला देता येत नाही जोवर सुखाची उपमा
आणि अबाधित राहील अश्रूंचे पावित्र्य
मी सुखीच असेन तोवर

गावातल्या त्या काजर्‍याच्या थळावर
आपण टांगलेले हौशी कलाबुतांचे पडदे
असतील का रे अजून !
आता व्यावसायिक नाटकांतून हिंडतो इथे तिथे
ह्या रंग-बिरंग्यांच्या शहरात
रंग बदलत चालला आहे त्वचेचाही
फाटके मोजे घालून फिरता येत नाही येथे
वाटल्यास अनवाणी फिरावे
काहीना पायच नाहीत रे मोज्यांसाठी
तू सुखाचे विचारतोस

यंत्रवत आहे सारे यंत्रवत आहे
अवघे सारे मनुष्यत्व दूर जात आहे
कधी कदी मारला जातो माझ्यातलाही माणूस
मला भारते सणक हात पुढे करणार्‍या भिकार्‍याची

खूप दिवस झाले या प्रदेशात कोकिळेने गाणे गायचे
बंद केले आहे
त्याऐवजी घुघुत्कार ऐकू येतो
फॅक्टर्‍यांतून, कार्यालयांतून आणि निर्झाड गिरीकंदरातून

यार तू लिहितोस कुटुंबाच्या सौख्याविषयी
अगदी आबादी आबाद आहे
आहे एक पत्नी चार चौघांसारखी प्रेमळ
नाही कळत मात्र त्यात निकं सत्य किती
किती असहाय्यता

दोस्ता बाजारातही अलिकडे क्रांति झालिये फार
कोणी म्हणतात ते अद्भुत आहे, कोणी वास्तव
आपणही ठरवलेय आता मागे रहायचे नाही
म्हणून घरात आणतो आठ आण्याची झम्पाला कार,
एक रूपयाचे चॅलेंंजर यान
आणि दीड रूपयाचे मुलांचे अश्रू

सरते शेवटी ही व्यसने
त्यानीच तर अर्धे अधिक मरू घातले आहे मला
आणि खरे सांगू दोस्ता
जगण्यासारखे काहीच नव्हते जेव्हा
तेव्हा त्यांनीच तर जगविले होते अर्धे अधिक मला


नस

अनामिक वासाच्या ओढीनी
पुन्हा पुन्हा आपण जिते जन्म घेतले
तेच हे ठिकाण
पुन्हा पुन्हा मोह होतो जगण्याचा
वाटते कधीतरी नक्कीच येईल
सोनरी झुंबरांच्या मोहल्ल्यात अडकून पडलेला वारा

सांद्र घेरीच्या वेळी अनावर होऊन
मी घालत राहतो फुंकर
किती पाशवी बलात्कार झाले आपल्या आयुष्यावर
माळरानावर पतंग उडविता उडविता
ठेंगणे होत गेलेलं आपले अस्तित्व
ज्या वाटांवर फुले वेचली
तिथले दगड न्याहाळू लागतो मी
मला दिसू लागतात
मातीच्या गर्भगंधाने फुलून आलेली झाडे
तेच खरे दिवस होते तरी
गवताचे भारे माथ्यावर तोलता तोलता
मला आठवलेला चे गव्हेरा
वडिलोपार्जित जमिनीत मी शिंपडलेले चार दाणे
आणि पारव्यानी केलेला
अव्यापारेषू व्यापार

नंतरच्या रीत्या पोत्यात भेटलेल्या तुकाराम
रात्र काळी घागर काळीच्या दिवसांत
आपणच आपल्या शिस्नाशी
केलेले अविरत बलात्कार
अशा मैथुनमयी दिवसांतही
कुणा लक्ष्मीच्या योनीवरून हात फिरवताना
शरीराचा झालेला भुगा भुगा
फेसाळल्या मेंदूने समुद्राला अर्पण केलेली
एक पुर्णनग्न संध्याकाळ…

हेच ते ठिकाण
अजूनही त्याच वाटेवरून येतो-जातो मी
कशा कळाहीन झाल्या आहेत या वाटा
आताशा पुन्हा पुन्हा चाचपून पहातो
मी मला
किती जिवंत, किती मेलो आहे ते
अजून नस सापडायची आहे

रूजून येते मनात काही

रूजून येते मनात काही सजून येता दु:ख दिवाणे
या सजण्याने त्या रुजण्याला कैवल्याची फुटती पाने

दूरदूरच्या दर्‍या सुंदर्‍या जवळ जवळची खुरटी राने
मिटून जाता धुके दरीचे तृष्णेलाही फुटती पान्हे

जसे तुझे हे खुणेने गूढ कायसे मला सांगणे
अव्यक्ताच्या झाडाखाली व्यक्ताचे मग खुलते गाणे

लुटून नेले मला परीने सांजआंधळ्या हिर्व्या रानी
चंद्रबळाच्या स्निग्ध प्रकाशी उरलेसुरले नुरले जगणे


नक्षत्रांच्या मुळाशी पाऊस पडत आहे

पाऊस पडत आहे
नक्षत्रांच्या मुळाशी पाऊस पडत आहे
आंब्यांच्या आमराईत...जुईच्या जुईराईत
तल्खलीच्या लल्खलीवर...खणगणीच्या खणीमध्ये
कातरलेल्या कातळावर...मंद मऊ मातीवर
ताशांच्या तडतडीचा तडातड पाऊस पडत आहे

अंत:करणाच्या अनंत नगरीतील
स्पप्नांच्या सलील घरांवर शापोराच्या तीरावरती, आडीच्या आडकुशीत
झाडांच्या दाटीवाटीत वसलेल्या गावामध्ये
गावाकडच्या घरावरती, घराकडच्या ओस परसात
मुक्या मुक्या अंगणात मुसळांच्या धारांचा
जमदग्नी पाऊस पडत आहे

तट्ट तट्ट चोळीसारखा, गावरान पोरीसारखा
मुसमुसणार्‍या यौवनातला धसमुसळ्या मदनाचा
मंजिरी पाऊस पडत आहे...

सागराच्या छाताडावर, पहाडाच्या पाठीवर
माळावरच्या गवतामध्ये जलवंती नाचत आहे
पाऊस पडत आहे...
रक्तामधल्या कणाकणांत, त्वचेवरच्या रोमरोमांत
अव्यक्ताचा व्यक्त जसा
पाऊस पडत आहे…

मातेशी नाळ तुटून मातीशी नाते जुळले
भाळावरच्या आभाळावर ललाटाचे लेप आले
तेव्हाही तो असाच कोसळला
तिची भेट, त्याचे येणे
तिचे बिलगणे, याचे बिथरणे
एकांताच्या टोकावरती श्‍वासामध्ये श्‍वास रूतला
धुंवाधार बरसातीचा तेव्हा त्याने पडदा केला

सुलज्जेच्या चुर्‍यासारखा, मीनाक्षीच्या अक्षांसारखा
वक्षांवरच्या अक्षांशावर, घळीमधल्या रेखांशावर
पाठीवरच्या पनळावर, नितंबाच्या निसरडीवर
तेव्हासारखा आजही
रंभांचा रंभागर्भी पाऊस पडत आहे…

अलक्ष्यांच्या लक्षांमधला
आदीपासून अनादीचा...अल्लड आणि अवखळ
अनिवार्यतेचा पाऊस पडत आहे…

माझ्या अंतरीचा विठू

ओल्या मोसमात जिथे थोडी तुडवली माती
माती अंगांगे भिनली तुला अंकुर फुटती

मग सोडियले गाव आलो पंढरीच्या दारी
इथे विठ्ठलच मुका मुके मुके वारकरी

आधी चंद्रभागे न्हालो मग पुंडलिक झालो
जिथे तिथे तुकयाला हाका मारत हिंडलो

एक जनाईची ओवी ओवी शीलालेख झाली
तिचा अर्थ शोधताना वीट वितळून गेली

कसा सुटेना हा गुंता, फूल फांदिला धरेना
अरे, कवितेच्या देवा कधी गोठेल वेदना ?

पुन्हा गावाचेच वेध वाटे गावाला जायचे
माती माखून अंगाला खार्‍या पाण्यात न्हायचे

माती नांगरून शेती मळे फुलवीन जेव्हा
माझ्या अंतरीचा विठू रूजो येईल हो तेव्हा


(या कविता कवीनेच ब्लॉगसाठी निवडून दिल्या आहेत.  )

No comments:

Post a Comment